काल परवाच 10 वी 12 वी चे निकाल लागले.

 या वर्षी online परीक्षा...काही झाल्याच नाहीत त्यामुळे ही परिस्थिती आलीच नाही, पण दोन वर्षांपूर्वी लिहिलेलं हे आज FB ने परत आठवून दिलं ...ते तसंच पाठवतोय ...


☺️😊😢


काल परवाच 10 वी 12 वी चे निकाल लागले. आजच्या स्पर्धेच्या युगात हे दिवस म्हणजे अनेक विद्यार्थी त्यांचे पालक यांच्या साठी एक प्रचंड घालमेल हृदय पिळवटून टाकणारे  उत्त्कंठा वर्धक आणि एका वेगळ्या भाव विश्वात घेवून जाणारे असतात. पण या तथाकथित स्पर्धेचा एक अकारण उच्छाद निर्माण केलेला आहे आणि विशेष करून मागील 15 ते 16 वर्षा पासून  याच एक अवास्तव थोतांड भर घालत आहे.  मी 1984 साली SSC झालो तेंव्हा ही स्पर्धा नव्हती अस नाही पण तेंव्हा परीक्षा पास होणं हेच एक दिव्य दैदिप्यमान यश मानलं जायचं. त्या वेळी हॉल तिकिट सांभाळून ठेवणे किंवा आजच्या सारख्या त्याच्या स्कॅन आणि लामीनेशन करण्याची तंत्रज्ञान व्यवस्था उपलब्ध नव्हती. मला आठवतंय आमच्या लाकडी छतावर आमच्या त्या पिढीतील सर्वांचे परीक्षा क्रमांक आम्ही खडूने लिहीत असू. K26304 असा माझा आसन क्रमांक मला आज ही ठळकपणे आठवतोय जो धुराने काळ्या झालेल्या खणावर मोठ्या दिमाखात कित्येक वर्ष होता. गल्लीतील एक जाणकार व्यक्ती सर्वांचे निकाल पाहून यायचे. नंतर फोन आले मग बोर्डाच्या ऑफिस मध्ये फोन लावून तो विचारायचा किंवा कुठल्यातरी वर्तमान पत्राच्या कार्यालयात जाऊन एका भल्यामोठ्या बुकलेट मध्ये आपला निकाल शोधणं म्हणजे एक दिव्य होतं. कुठलाही पालक कधीही शाळेत जावून किंवा स्वतः हुन आपल्या पाल्यांचे निकाल पाहून आले नाहीत. त्यामुळे त्या पिढीतील लोक अगदी या बाबतीत मागे होते हे म्हणण्या पेक्षा ती त्यांची प्राथमिक गरज नव्हती आणि त्या मुळे एक अनावश्यक तणाव विद्यार्थी आणि पालक दोघांवर ही नव्हता. त्या मुळे आम्ही एक सशक्त बालपण जगलो आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे. 


त्या उलट आज आई आणि बाप हे दोघेही आपली वयक्तिक जबाबदाऱ्या(नोकरी । व्यवसाय)  सांभाळून त्याच्या दुपटीने मुला मुलींच्या शैक्षणिक जबाबदाऱ्या डोक्यावर घेऊन एक त्रस्त जिवन जगतात. त्यांचं ते केविलवाणे जगणे पाहून दया येण्या पेक्षा चीड येते. अहो किती स्पर्धा आणि कोणाशी. आपली स्पर्धा ही फक्त आपल्या सोबत मर्यादित ठेवून एक सुलभ जिवन जगावं. पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब होती एका एका घरात 10 ते 13 शालेय विद्यार्थी असायचे आणि पालक 1 मे च्या दिवशी विचारायचे पास झालास का आणि हो म्हणून सांगितलं की झालं. जिथे घरची मुले कुठल्या वर्गात आहेत त्याचा थांगपत्ता नसलेल्या त्या लोकांना इतर कुनाविषयी काहि एक देणं घेणं नव्हतं. असलंच तर ते प्रेम, मायेचा ओलावा आणि आपुलकी होती. आज त्या गोष्टींनी मत्सर तिरस्कार अश्या जागा घेतल्या आहेत.  इतरांच्या दुःखात तर सोडाच पण कोणाच्या आनंदात ही अंत:करणापासून लोक सहभागी होत नाहीत. किंबहुना आपल्या दु:खापेक्षा ते इतरांच्या सुखाने जास्त दुखावतात. ही मानसिकता आज बोकाळली आहे पण या सगळ्या गदारोळात त्या बिचाऱ्या मुलांची आयुष्य उध्वस्त म्हणण्या पेक्षा उसवत असतात आणि धाग्यांची वीण ढिली होत अंतर वाढत जातंय याची यांना अजिबात जाणीव नाहीये याची खंत आहे. बर स्पर्धाच जर जगायची आहे तर मग ती ही प्रामाणिक जगा आणि मैत्रीपूर्ण होऊ द्या. आणि यशाच्या परिसीमा या संकुचित किंवा फक्त इतरांना खाली पाहण्यासाठी नको. अनेक लोकं यात फ़क्त एक इर्षा म्हणुन उतरतात आणि मग हसु होऊ नये म्हणुन कुठल्याही तडजोडी करु पाहतात. अनेक मानस  शास्त्रज्ञ त्यांचे मत मांडताना विशेष सांगून गेले आहेत की प्रत्येक मूल हे विशेष असतं. प्रत्येकाचा बुध्यांक वेगळा असतो त्या मुळे त्यांची जगण्याची जगा कडे पाहण्याची आणि अभ्यासाची शैली ही वेगळी असते. काही जन्मतः बौद्धिक तेजस्व घेऊन येतात, काही थोडी मोठी झाल्यावर अचानक हुशार होतात. कोणी खेळात प्राविण्य मिळवतात अनेक मार्ग पादाक्रांत करतात आणि स्थिरावतात. पण या मध्ये एक फरक कटाक्षाने दिसतो तो म्हणजे मारुन मुटकून आणलेली हुशारी जी सर्कशीत रिंग मास्टर दाखवतो तशी. काहि अगदी त्यालाही न डगमगता स्वतः च अस वेगळं अस्तित्व दाखवणारी.  परवा CET च्या परीक्षेला मुलाला सोडताना हजारो मुलं पाहिली आणि हा फ़रक अजून जवळून पाहिला. काहि पालक तर चावी भरून एक खेळणं घेऊन यावं अस आपल्या मुलांना घेऊन येई होते आणि त्या वर सूचनांचे भडिमार. काही अगदी सहलीला आल्या गत पण प्रसन्न चेहेरे, काही चेहेऱ्यावर एवढी भीती आणि गोंधळ की वाटावं हा एक नॉर्मल मुलगा किंवा मुलगी नाहीये. शारीरिक विचीत्र हालचाली आणि दडपण खाली असलेली अनेक मुलं पाहिली अन मी घाबरलो ते वास्तव पाहताना. कारखान्यात निर्माण होणारे विविध उत्पादन एवढंच म्हणता येईल या सर्वांना. कारण खरं जगणं सोडुन एका आभासी विश्वात दिसली ती. विचीत्र आहे पण वास्तव आहे. हे सर्व इथेच न थांबता ते लोक समूहात ही एक वेगळी असूया इर्षा घेऊन वावरत राहतात. या प्रवासात माणस दुरावतात. काही खोडसाळ मंडळी या परिस्थितीत अजून तेल ओतण्याचे काम करतात. एरवी तुम्ही जीवंत आहात की नाहीं याची जरा सुद्धा काळजी न करणारे लोक निकालाच्या दिवशी मुद्दाम तुमच्याशी संपर्क करणार.  अशा ठराविक प्रसंगात संपर्क करणारी ठराविक लोकं सगळी कडे आहेत. तो वेगळा मानसिक दबाव या मुलांवर आणि त्यांच्या पालकांवर असतोच. सब कुछ मुलांसाठी या एकमेव तत्वावर होणारी त्या आईची फरफट , केवळ जबाबदारी नको म्हणून त्या पासून अलिप्त पण जोडला गेलेला बाप, आणि मुलांवर जीवापाड प्रेम करणारे आजी आजोबा हा विरोधी पक्ष आमने सामने असतात. आईला वाटतं याने डॉक्टर व्हावं बापाला वाटतं इंजिनिअर आजोबा ला शिक्षक तर आजी ला अजून काहीतरी , आणि हे सर्व डोक्यावर 15 ते 20 वर्षे घेऊन या मुलाची पुरती तारांबळ उडालेली असते या तुन च काही अप्रिय घटना पहायला मिळतात. तेंव्हा हे सर्व थांबले पाहिजे बदलले पाहिजे ही काळाची गरज आहे. नाही तर फुलं असलेली मुलं कायम कोमेजतील आणि जीवनाच्या बगीच्याचे सौन्दर्य संपुष्टात येईल ।। जिओ और जिने दो .    


शरद पुराणिक, देवगिरी एक्सप्रेस

जून 10, 2019

Comments

Popular posts from this blog

बायकोची जीवश्च कंठश्च मैत्रीण मानसी चा जन्मदिन....

ओढ लावती अशी जीवाला गावाकडची होळी

Year 2024 another year of Fabulous, Marvelous, Magnificent Wedding Event!!!