राष्ट्रकाम सप्तदश रात्र महासोमयाग 11 मार्च ते 9 एप्रिल 2024श्री क्षेत्र अयोध्या







 राष्ट्रकाम सप्तदश रात्र महासोमयाग 11 मार्च ते 9 एप्रिल  2024श्री क्षेत्र अयोध्या


न भूतो न भविष्यती असा हा दिव्य सोहळा या पृथ्वीतलावर होत असताना तुम्हाला रामायण, महाभारत या दिव्य पर्वात जगण्याची अनुभुती आहे.... खरतर जर कोणी guiness book किंवा limca book of records या संदर्भित लोक हे वाचत असतील तर कृपया या कार्याची दखल घ्या...


आम्हाला अवॉर्ड नको, बक्षीसही नको पण राष्ट्र सेवा आणि या भूतलावर असलेल्या प्रत्येकाच्या संरक्षणार्थ, वसुंधरेच रक्षण, पर्यावरण संरक्षण या आणि याच संकल्पाने साकार होणाऱ्या या धर्मकार्यात लोकांचा सहभाग होण्यासाठी आणि यज्ञ संस्था टिकून राहावी या साठी हे सर्वतोपरी पोचवा हेच आमचं अवॉर्ड आहे. आणि त्यासाठी ज्या प्रकारे शक्य आहे त्या प्रकारे मदत...ते ही नसेल तर फक्त एकदा पाहण्यासाठी आणि हे कार्य जाणून घेण्यासाठी आवश्य या, पाठवा.


गुरू माझा यज्ञ मार्तंण्ड, बहु सोमयाजी, कर्मयोगी, ज्ञानयोगी, निघाला घेऊन यज्ञध्वज करण्या यज्ञीय कार्यास राजयोगी


इवलेसे रोप लावियेले द्वारी |

त्याचा वेलू गेला गगनावरी ||

प्रवर्ग्य फुलला सोमयाग बहरला |

वाहता आहुती प्रेमभावें, अग्नी गगनी भिडला ||

वसुंधरे चे प्रेमे यज्ञीय सेवे देह अर्पियेला |!

सृष्टीयेचे रक्षणी याग योजियेला ||

प्रवर्ग्य फुलला ...सोमयाग बहरला !! 


माझ्या या पूर्वीच्या अनेक लेख मालिकेतून मी या कार्याविषयी भरपुर लिहिलं आहे. अगदीच ताजे संदर्भ द्यायचे झाल्यास, श्री क्षेत्र नाझरे येथे झालेला आयुषकाम षड रात्र सोमयाग, त्या पूर्वी खडकी (बीड) येथे पार पडलेला अंगिरस  द्विरात्र सोमयाग,  SVYASA विद्यापीठ बेंगलुरु इथे पार पडलेला पशुकाम महासोमयाग यज्ञ सोहळा आणि  नंतर लगेच पुणे येथे सतत महिनाभर पार पडलेला दिव्य शिवपूजन सोहळा. त्या नंतर वृंदावन येथे पार पडलेला दशरात्र महासोमयाग... दोन वर्षांपूर्वी आलेला त्रिशताब्दी  अमृतयोग. मोठ्या महाराजांच जन्मशताब्दी वर्ष, सेलूकर घराण्याच्या अग्निहोत्र दीक्षेला ही 100 वर्ष आणि पार्थिव शिवपूजन सोहळ्याची ही 100 वर्ष.  या प्रत्येक यज्ञीय आणि इतर अनुष्ठानाचे मी माझ्या बाल, अज्ञानी (हो मी स्वतःला अज्ञानी च समजतो - ते कार्यच एवढे दिव्य आहे) बुद्धीने जसं जमेल तसं त्याच वर्णन करून आपल्या पर्यंत पोचवन्याचा हा एक सूक्ष्म यत्न.  


आदरणीय श्री यज्ञेश्वर महाराजांनी 2003 साली अग्निहोत्र दीक्षा घेतली आणि  गेल्या वीस वर्षांत 28 ते 30 सोमयाग त्यांनी केले. त्यात ही महामारीच्या काळात बंधनं असल्या कारणाने दोन वर्षे काहीही यज्ञीय कार्य न घडल्याची एक खंत होती, पण फेब्रुवारी 22 ला निघालेला हा रथ आता दिव्य गतीने मार्गस्थ होत आहे. गेल्या दोनवर्षात हा पाचवा महासोमयाग त्यांनी आयोजिला. संकल्प ही त्यांचाच, तयारीही त्यांनीच केली आणि त्याचा बिगुल वाजला.



देशभर,  जगभर श्री राम  अयोध्येत नुतन भव्यदिव्य वास्तूत विराजीत झाल्यानंतरच्या या पर्व काळात हे अनुष्ठान ही घडत आहे. आम्ही शिष्य परिवार गर्व, अभिमान आणि आनंदाने प्रफुल्लित आहोत कारण महाराजांनी घडवलेले संस्कार, दिलेली संथा तिथे प्रभु श्रीराम प्राण प्रतिष्ठा अनुष्ठानात ही सहभागी होते ते श्री अरूण भिसेगावकर गुरुजी. माझी जन्मभूमी बीड येथूनही अनेक ब्रम्हवृंद या अनुष्ठानात होते.  देशभर श्री राम विविध रुपात सजले गेले. गावोगावी, गल्लोगल्ली लक्षावधी व्रत, वैकल्ये, सोहळे घडले. मांगल्य आणि पवित्र या पर्वकाळात एक अद्भुत अनुभुती देऊन गेले... सारा आसमंत, फुले, झाडे, नदी, सागर, पर्वत चौफेर राम नाम लहरत आहे..या दिव्य पर्वात आदरणीय गुरुमाऊलींचा हा याग जणू "अश्वमेध याग" वाटावा हे भाव माझ्या स्थायी ..त्या माझ्या गुरुस वंदन. 


खरतर गेली कित्येक वर्ष हा याग अयोध्येत व्हावा ही आदरणीय गुरूंची एक इच्छा आज सर्वार्थाने पूर्त होत असताना आम्ही लेकरं ही या आनंदात न्हाऊन निघालो आहोत.  



महाराष्ट्रातून अनेक शिष्य परिवार तिथे गेले आहेत. त्यातील आमच्या अनेक भगिनी नऊवारी पातळ नेसून, डोक्यावर घागर, वृंदावन घेऊन, तर महाराज मायबाई नेहेमीप्रमाणे ही तेजोमूर्ती रूप त्या सोहळ्यास उपस्थित होतेच.  खरं तर त्या दोघांच्या आग्रही आमंत्रणा मुळे ...म्हणजे आई बाप पोरा बाळांना चार दिवस माहेरी बोलावतात, अगदी त्याच मायेने आणि प्रेमापोटी मायबाई ही सर्वांची आई होऊन बोलवतात ...मग लेकरच ती, त्याच ओढीने निघतात. आणि दोघेही स्वतःची सोडून इतरांची काळजी इतकी घेतात की ..काय सांगु. 

असा तो सर्व परिवार, वेदपाठ शाळेचे विद्यार्थी, गुरू जण, असा तो समस्त परिवार एकत्र घेऊन या दिव्य कार्याची अनुभूती घेत आहेत. 


पुर्व तयारी, यज्ञ कुंड, यज्ञ शाळा, मंडप निर्मिती, ,असं करत करत काल त्याच दिव्य क्षेत्रात अग्निस्थापना, शोभायात्रा, ध्वजारोहन आणि दिक्षा विधी झाला...आदरणीय वंदनीय आचार्य स्वामी गोविंद गिरी महाराज यांच्या हस्ते ध्वजरोहन होऊन हा  सप्तदश रात्र महासोमयाग श्री क्षेत्र  अयोध्या येथेसुरू झाला...श्री गोविंद गिरी महाराज हे राम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष आहेत त्यांचे ही आशीर्वाद आणि शुभेच्छा या कार्यास मिळाल्या...या कार्यक्रमात भरजरी नऊवारी साडी घालून मायबाई तर रंगीत काठाचं धोतर घातलेलं गुरू माऊली  आणि गुरू मातेच ते रूप दिक्षा विधी नंतर ते सर्व त्यागून शुभ्रवस्त्रात अशी ही दोनीही मोहक रूप पाहिली.


जर आपणास शक्य असेल तर ९ एप्रिल पर्यंत आवर्जून  जाऊन या.. जर आपल्या संपर्कात ले कोणी आयोध्येत असतील, या दरम्यान जाणार असतील त्यांनी ही आवश्य कळवा. फिरणे, पाहणे असं सर्वांगी होईल ..नवचंडी,. शतचंडी, गणेश याग अशी ही अनुष्ठाने आहेतच, या शिवाय रोज श्रीसूक्त हवन आणि यज्ञातील प्रमुख अनुष्ठाने असा भरगच्च कार्यक्रम आहे ...


" ॐ पूर्णमदः पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते I

 पूर्णस्य पूर्णमादाय ,      पूर्णमेवावशिष्यते II


मर्यादा पुरुषोत्तम श्री राम जिथे दिमाखाने विराजमान आहेत तिथेच जिथे मंदिर निर्माण शिला जिथे आहेत त्याच जागेवर हे दिव्य कार्य घडत आह. 



492 वर्ष ते आज ही चाललेल्या या संघर्षाचा एक मोठा अध्याय  सत्याच्या बाजूने उकलून वचनातीत झाला. फलश्रुती झाली. अगदी अनादिकालापासून जे घडले ते इथे ही घडलेच. विघ्नसंतोषी, असुरी वृत्ती, या विचार धारेने पछाडलेले, किंवा मंथरा प्रभावामुळे, राजकीय, वयक्तिक स्वार्थासाठी या योजनांना सुरुंग लावणारे भले भले हे राम मंदिर सहजा सहजी निर्मित  होऊ देतील की नाही अशी शंका असताना आदरणीय मोदीं जी नी ते असं काही घडवून आणलं की विचारू नका.  आणि त्या पवित्र भूमीत चैतन्य, उत्साह, धर्मप्रेम आणि अजून बरच काही त्या वादातीत भूमीत निर्माण केलं ....मी. माझ्या लहानपणापासून जेरबंद श्रीराम आणि फोटो पाहत होतो आणि आजचे चित्र हे फक्त दैवी चमत्कार असू शकतो ... अर्थात सातत्य, संघर्ष, खरी निष्ठा आणि महत्प्रयासाने तो दिव्य क्षण आणी त्याचा आनंद आपल्यापर्यंत पोचवला हे अगदी स्वप्नवत, दैवी, अद्भुत अस आहे. 


ज्या रामाने जन्म ते पुनर्वतार या अखंड "रामायण" मालिकेत यावज्जीवन सतत संघर्ष, अडचणी, धर्मसंकट, राष्ट्रप्रेम किंवा राष्ट्रासाठी सर्वस्व पणाला लावलं. अनेक दिव्यातून अन सर्वार्थाने "अग्नी परीक्षा" द्याव्या लागल्या , त्याच दिव्य भूमीत आयोजित केलेला हा याग गुरू माउलींनी प्रत्यक्षात आणला त्या साठी ही अनेक अडथळ्यांची शर्यत होती, सर्वात मोठी बाब कुठल्याही यागासाठी ते म्हणजे आर्थिक नियोजन.  शेकडो लोकांची राहण्याची, खाण्याची आणि यज्ञीय कार्यातल्या सर्व विधी, सामुग्री, विद्वान ऋत्विज आणि मंडळींची उपलब्धि,  आणि मोठी जागा जिथे हे सारं एकाच स्थळी निर्माण करणे हे दिव्य कार्य संयम शांतता आणि निस्सीम यज्ञ सेवेच्या वृतातून माउलींनी घडवून आणलं.  तिथे राहणाऱ्या शेकडो लोकांचं तर सोडा पण रोज या यज्ञभूमीच्या समोर येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला प्रसाद वाटप होतय. अनेक लोक या दिव्य प्रसादाचा लाभ घेत आहेत. त्या सोबतच आमच्या सारखे शिष्य गण, परिवार यांची ही नित्य, जशी जमेल तशी हजेरी आहे. त्या सर्वांची व्यवस्था. 


उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री श्री योगी आदित्यनाथ ही स्वतः या वर लक्ष ठेऊन आहेत, त्यांच्या गोरखपूर  येथील गोरक्षनाथ  पिठाच  संत महंत, व्यव्थापन अधिकारी दीन प्रतिदिन येऊन प्रासादिक अनुभूती घेऊन जात आहेत. 


हे सर्व होत असताना महाराज मायबाई मात्र फक्त दूध ग्रहण करतात, अन्न वर्ज्य आणि शुभ्र वस्त्रात संपूर्ण यज्ञकाल यज्ञाभुमित राहायचं काय तो त्याग.

 

पण या त्याग मुर्ती  त्यांच्या एका दिव्य स्वप्नपूर्ती  कडे मार्गस्थ होत आहेत त्याविषयी एक विशेष लेख पुन्हा नक्कीच येईल. 


सोबत या यज्ञीय नित्य कार्यक्रमाची काही क्षणचित्रे पाठवत आहे. आणि आपणास विनंती आहे, जर आपण किंवा आपले स्नेही कोणीही या काळात अयोध्येत असाल, किंवा तुमचे परिचित जे अयोध्येत आहेत, उत्तर प्रदेशात आहेत त्यांच्या पर्यंत ही माहिती पोचवा आणि अवश्य जाण्यास सांगा. 


!! यज्ञ नारायण भगवान की जय !!


शरद पुराणिक

३१०३२४

Comments

Popular posts from this blog

ओढ लावती अशी जीवाला गावाकडची होळी

गौरी गणपती