Posts

Showing posts from 2020

वेडात मराठे वीर दौडले सात मी या पूर्वी लिहिलेल्या लेखात याचा संदर्भ दिला होता. या महामारी मुळे जे लोकडाऊन आपणा सर्वांना अनुभवायला मिळाले ते अनेक अर्थाने शाप आणि वरदान अशा दोनीही बाजूने होते. प्रचंड आर्थिक नुकसान, वित्त हानी, व्यापाराची कंबर मोडली, कामगार अक्षरशः हतबल झाले. हे सर्व होत असताना तुमच्या माझ्या सारखे वेग वेगळ्या भूमिकेतून या काळात वावरत होतो आहेत. ज्याला जसं शक्य होईल तशी किंबहूना आपल्या परिघाबाहेर जाऊन ही अनेकांनी आर्थिक आणि इतर मदत केलीच. कित्येक लोक ज्यांना स्वतः ला खरच मदती ची अपेक्षा असतांना देखील अनेक वेगवेगळ्या मदत प्रक्रियेचा भाग म्हणून राबले, आज ही राबत आहेत. एरवी टवाळ, आवारा किंवा वाह्यात असं वाटणाऱ्या वस्त्यातील अनेक मुलांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून या मदत कार्यात सहभाग नोंदवला. मोठ्या उद्योजक किंवा सिनेमा क्षेत्रातील लोकांचं योगदान होतं आणि त्याची चर्चा ही होते. पण हे अदृश्य नायक कायम या चर्चे पासून दूर असतात, कसली ही प्रसिद्धी नाही पण प्रत्यक्ष मदत करण्यात सर्वस्व मानणारे हे लोक कायम उपेक्षित असतात कौतुकापासून. औषध, भाजीपाला, अन्नधान्य वाटप, रुग्णांना मदत अगदी उचलून नेऊन ते अंत्यसंस्कार इथपर्यंत मदत ते ही निस्वार्थ. तुम्ही आम्ही जेंव्हा घरात बसून हे सर्व माध्यमातून पाहत ऐकत होतो तेंव्हा हेच आपलं ते बसणं सुखकर होण्यासाठी लढत होते. दंगल, पूर, भूकंप की आणखी काही हा वर्ग कायम तत्पर असतो. अगदी चौकाचौकात होणाऱ्या ट्रॅफिक जॅम ला पण हेच पूर्वपदावर आणतात. या काळात टिव्ही वर स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका रोज दाखवली गेली, पहिले काही दिवस ती 4 तास होती, नंतर 2 तास झाली. मी आवर्जून ही मालिका पाहिली, पाहत आहे. या मालिकेत हो असे अनेक शूर वीर दाखवले ज्यांची इतिहासात तशी फारशी दखल घेतलेली नाही. रायप्पा, जोत्याजी, लाडी असे शंभुराजेंच्या श्वासा सोबत जगणारे मावळे. इकडे हंबीरमामा, बहिर्जी काका, हिरोजी, आणि त्यांच्या दिमतीत असंख्य मावळे. फक्त आणि फक्त छत्रपती आणि राज्याची सेवा यासाठी सबंध आयुष्य पणाला लावलेली मंडळी. बहिर्जी नि तर फक्त आणि फक्त संकट झेलायची आणि ती सावरून ते सुख पुन्हा राजाच्या पायी ठेवायचं. ऊन, वारा, पाऊस, भूक, तहान हे सर्व विसरून, जीवाची पर्वा न करता झोकून घ्यायचा स्वतःला संकटात - का तर लाखोंचा पोशिंदा जगला पाहिजे. महाराजांच्या गनिमी काव्याचे ते कायम मुख्य सूत्रधार होते. मालिकेतल्या प्रत्येक प्रसंगात त्यांची अन महाराजांची जी संभाषण आहेत ती पुन्हा पुन्हा आवर्जून पहावीत अशीच आहेत, अगदी क्षणिक संवाद पण त्यात सर्व काही सामावलेले असायचे. तसेच हंबीरमामा, खरे तर राजाचे मेहुणे, पण स्वतः ला कायम स्वराज्या चा सेवक मानून, पडेल ती जबाबदारी चोख बजावली. सरनोबत असूनही पदाचा माज कधीच दाखवला नाही आणि शंभूराजे विषयीची आत्मीयता आणि प्रेम त्यांच्या लकाकत्या डोळ्यात सतत चमकत राहिले. अनेक गहिवरून टाकणारे प्रसंग या दरम्यान आहेत. इकडे रायप्पा, लाडी आणि जोत्याजी, काय ते स्वराज्य प्रेम. क्षणा क्षणाला जीव धोक्यात घालायचा. सततची घौडदौड , ऐनवेळी बदलणारे नियोजन, त्यालाही तितक्याच तीव्रतेने ते आमलात आणायचे. कायम शत्रूच्या गोटात जायचं, पाहताना ही अंगावर काटा येतो. हे आणि असे अनेक unsung heroes या इतिहासात दडलेले आहेत. काही व्यक्ती ( विशेष करून अनाजी दत्तो) विषयी जरा वाद असले तरीही महाराजांचे अष्टप्रधान मंडळ ही त्याच ताकतीने पण वैचारिक पातळीवर , उत्तम नियोजनासाठी आणि प्रशासकीय व्यवस्थे साठी होती. त्यांच योगदान ही अति मौल्यवान होतेच. पेशवे, चिटणीस, न्यायाधीश, कारभारी ही आणि अशी अनेक मंडळी होती ज्यांनी स्वराज्यासाठी आपलं जीवन वाहून घेतलं. एक दोन जणांनी गैरव्यवहार केलें असं मालिकेत दाखवले आहे आणि त्यावर बऱ्याच उलट सुलट चर्चा, प्रतिक्रिया, विचार आहेत - आपण चांगलं ते घ्यायचं वाद सोडुन. बाजी प्रभू, तानाजी मालुसरे हे ही होतेच पण इतिहासात त्याची दखल घेतलेली आहे. आजचा हा लिखाण प्रपंच म्हणजे संपूर्ण आयुष्य पणाला लावून , संघर्ष करून ज्यांनी स्वराज्य उभं केलं पण त्यांचा विशेष उल्लेख फारसा सापडत नाही त्या समस्त उत्तुंग व्यक्तीमत्वांना मानाचा मुजरा. आज छत्रपती शिवाजी राजेंचा राज्याभिषेक दिन, त्या निमित्त आज हे सर्व प्रकर्षाने लिहावे वाटलं - छत्रपती शिवाजी महाराज की जय ।। जय भवानी जय शिवाजी ।। हर हर महादेव शरद पुराणिक पुणे 6 जुन 2020

माझी लुटुपटू ची नाट्य चळवळ, भाग 2 मी मागे माझ्या नाट्य प्रवासाविषयी लिहिले होते त्याचा हा दुसरा भाग. काल जून्या फोटो मध्ये एक फोटो दृष्टीस पडला आणि मी थेट त्या कार्यक्रमात पोचलो. सोबत फोटो जोडत आहेच. आम्ही म्हणजे मी, प्रशांत कुलकर्णी, भगतसिंग देशमुख, नितीन जोशी, विवेक गंगणे, बाळू मुकादम, श्रीपाद कुलकर्णी, आनंद कऱ्हाडे आणि लेखक दासू वैद्य आणि संजय कुलकर्णी-सुगावकर सोबत (आणि लिहिण्याचा संदर्भ आणि काशीनाथ घाणेकर सोबत जोडू नये) इतर अनेक असा आमचा एक समुह होता. खरं तर मी सोडला तर हे सर्व विज्ञान शाखेचे विद्यार्थी होते. पण माहीत नाही कशी पण आमची चांगली भट्टी जमली. तसे हे सर्व आमच्या बाळासाहेबांचे वर्गमित्र, पण दोस्त आमचे. या मैत्री चा ते दुवा होते. युवक महोत्सव हा एक मुख्य धागा होता ज्या मुळे मी यांच्यात रमलो. इतकं की मी आमच्या महाविद्यालयाच्या ऐवजी यांच्यातच असायचो, घुसायचो म्हणा हवं तर. सुधीर वैद्य, प्रकाश प्रयाग सर हे ही जणू माझेच HOD आहेत असं समजून एकरूप होतो त्यांच्यात. युवक महोत्सव ही एक महाविद्यालयीन जीवनात मिळालेली आशीर्वाद रुपी देणगी, जिथुन तुमच्या आतला कलाकाराला साद जाते, तारुण्याच्या भरात ती नशा औरच, इथे एकदा तुम्ही झिंगला की झालं. युवक महोत्सवाच्या अनंत आठवणी आहेत, एक गठ्ठा बक्षिसे जिंकायची, अंबाजोगाई औरंगाबाद अशी शर्यत असायची. यातच आमचा आपला असा एक हौशी समूह झाला. युवक महोत्सवातील एकांकिका इतकी गाजली की तिच्या प्रयोगाची मागणी येऊ लागली. "आम्हाला बांधायचंय मंदिर" अशी दासू लिखित ती एकांकिका होती. दरम्यान बीडला एकांकिका स्पर्धेत आम्ही ती सादर करण्यासाठी निघालो तिथल्या आणि त्या अनुषंगाने इतर गमती पण सांगणार आहे. त्या काळी ST चा प्रवास. संध्याकाळी प्रयोग होता, आम्ही सकाळी लाल गाडीत निघालो. कुठल्याही प्रकारची विशेष तयारी नाही, फार नाटकं नाही अगदी आपलं काही सरकारी काम करून संध्याकाळी परत यावं एवढीच ती तयारी. प्रायोगिक असल्याने नेपथ्य ही काही नव्हतं. प्रवासात टीवल्या बावल्या, खोड्या, असं होतं बीड आलं. चालतच आम्ही नाट्यमंदिर वर पोचलो. प्रयोग झाला, प्रचंड टाळ्या शिट्ट्या आणि हसणं अशी दाद घेत घेत एकांकिका पुढे जात होती. नेहेमी प्रमाणे संजू ने त्याची भुमिका बहारदार सादर करून प्रेक्षकांची मनं जिंकली होतीच. तांत्रिक बाबी नितीन जोशी आणि रंगमंच व्यवस्था, नेपथ्य आणि बारकावे हेरून ते व्यवस्थित करणारा प्रशांत. असं ते रसायन फार मिळून आलं होतं. माझी छोटी भूमिका होती त्यामुळे विंगेतून दोनीही म्हणजे रंगमंच आणि प्रेक्षक मी अनुभवत होतो. अतिशय थाटात प्रयोग झाला. आम्हाला लगेच परतायचं होतं. पण आमचे मित्र भगतसिंग एकदम संचारले आणि निळू फुले, श्रीराम लागु, ते आंबेजोगाईतील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती नि त्यांना पछाडलं. मी मुद्दाम नावं घेणार नाही. त्या सर्व व्यक्ती रेखा तो एक एक करून जगत होता. दरम्यान आमची आवरा आवर झाली आणि निघण्यासाठी मुख्य प्रवेशद्वार जवळ आलो. पण यांचा संचार अजून उतरत नव्हता, हे अर्थात फक्त विनोदापोटी चालू होतं, वेगळा अर्थ घेऊ नये. एक फर ची टोपी घालुन ती त्या त्या व्यक्तीच्या लकबी सारखी फिरत होती. जरा वेळ हसण्यावारी नेऊन आम्ही थांबलो, पण हे सुसाट निघाले होते. त्या काळी जर चला हवा येऊ द्या असतं तर 4 त 5 एपीसोड नक्की झाले असते, एवढं ते बाहेर निघत होतं. संचार संपला आणि आम्ही थेट ST स्टँड गाठले. रात्रीचे 10 वाजले असतील. औरंगाबाद वरून लातुर ला जाणाऱ्या त्या गाडीत आम्ही बसलो आणि पुन्हा एका भन्नाट प्रवासाला सुरुवात झाली. गाडी भरलेली होती. भगतसिंग ने कंडक्टर ला विनंती केली आणि त्यांची गळ्यातली पिशवी, तिकिटाची पेटी, कानात पेन घेऊन पूर्ण बस भर ते स्वतः कंडक्टर म्हणून वावरले. त्यात आम्ही सर्व त्याला साथ देऊ लागलो आणि अख्खी गाडी हास्याने खळखळली. बीड अंबाजोगाई प्रवासात "मस्साजोग" एक गाव जिथे थांबल्याशिवय तो प्रवास पूर्ण होत नाही. गरमागरम पोहे, चिवडा आणि चहा हे आवर्जून झालेच पाहिजे. रात्रीचे 11.30 होऊन गेले होते पण आम्ही त्यावर यथेच्च ताव मारून निघालो. दरम्यान आता मूळ कंडक्टर होते. गाडी जरा संथ झाली की आम्ही एकमेकाच्या डोक्यावर टपल्या मारणं सुरू केलं. तसे आम्ही 15 ते 20 जण होतो आणि पुढे मागे रांगेत बसलो होतो. अंधारात कोण कोणाला मारत होत याचा पत्ता लागत नव्हता, अशी धमाल करत तो प्रवास संपला. आता गंमत आहे ती आमच्या रोजच्या बैठकी, तालमी इत्यादी. ती पुढच्या अंकात, नक्की. थांबतो..... शरद पुराणिक